
स्वतंत्र चलन, मोहोर, राजमुद्रा यांची निर्मिती करून छत्रपती महाराजांनी स्वतंत्र राज्यसत्ता निर्माण केली
रायगड हे ठिकाण आहे त्या छत्रपतीचं, ज्यांनी लाखोंच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली
रायगड| छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व हे मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली आणि प्रेरणादायी पर्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले एक सक्षम नेतृत्व होते. त्यांनी भारतात हिंदवी स्वराज्य स्थापन करून, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या एका युगपुरुषाची ओळख निर्माण केली. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे राज्याभिषेक सोहळा, जो ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला. या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण देशात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला.
१६७४ मध्ये आजच्या दिवशी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. सप्तनद्यांचे पवित्र जलाभिषेक, सोन्याचा कलश, स्पष्ट मंत्रोच्चार, आणि सभागृहात विदेशासह देशभरातील सरदार, संत, आणि जनतेची उपस्थिती विशेष. शिवाजी महाराज सुवर्णसिंहासनावर विराजमान झाले आणि त्यांना मिळाली “छत्रपती” ही अभिमानाची आणि तेव्हढीच प्रचंड जबाबदारी असलेली उपाधी स्वीकारली. या सोहळ्याला काशीचे विख्यात पंडित गागाभट्ट प्रमुख ब्राह्मण म्हणून उपस्थितीत वैदिक पद्धतीने सर्व विधी पार पाडले असे सांगितले जाते. या सोहळ्याने शिवाजी महाराज केवळ एक लढवय्या नेता नव्हते, तर एक राज्यसंस्थापक नेतृत्व म्हणून पुढे आले.
इस्लामी, सुलतानी व मुघल साम्राज्याच्या काळात हिंदू धर्म आणि परंपरांना जेव्हा दडपले जात होते, तेव्हा शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याचा सन्मान वाढवला. हे या सोहळ्याचे विशेष महत्त्व म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांनी हा ऐतिहासिक पाऊल उचलून हिंदू संस्कृतीचा अभिमान पुन्हा जागृत केला. या सोहळ्यानंतर त्यांनी स्वतंत्र चलन, मोहोर, राजमुद्रा यांची निर्मिती करून एक स्वतंत्र राज्यसत्ता निर्माण केली.
रायगडाचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व दूरदृष्टीने जाणून घेत, शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून हा किल्ला निवडला निवडला. समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट उंचीवर स्थित असलेला रायगड किल्ला बाराशे एकर परिसरात विस्तारलेला असून सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेला आहे. मजबूत संरचना, डोंगराळ भूप्रदेशाने मुळे रायगड हा रणनीतीच्या दृष्टीने आदर्श ठिकाण होते.
रायगड किल्ल्यावर अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत – त्यापैकी प्रमुखस्थळे : दरबार हॉल (राजसभा), राणीवासा (शिवाजी महाराजांच्या पत्नींसाठी), होळी कुंड, बालेकिल्ला (मुख्य किल्ला भाग), महादरवाजा (प्रवेशद्वार) आणि शिवाजी महाराजांची समाधी – येथेच ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचे निधन झाले. यासह रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे शिवाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी जिजाबाई यांचे समाधीस्थळ आहे.
रायगड हा केवळ एक किल्ला नव्हे, तर संपूर्ण मराठा साम्राज्याचे राजकीय, आर्थिक आणि प्रशासनिक शक्तिस्थळच होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि रायगड या घटना व स्थळे मराठा इतिहासाचे आत्मा आहेत. राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली आणि रायगडाने त्या साम्राज्याला भक्कम पाया दिला. आजही रायगड किल्ल्यावर उभं राहिलं की मन अभिमानाने भरून येते. कारण हे ठिकाण आहे त्या छत्रपतींचं, ज्यांनी लाखोंच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली.
