
मंत्रालयातील दालनात विशेष बैठक संपन्न
मुंबई | बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्याची घोषणा पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दहा फेब्रुवारी रोजी केली.
मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीस माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील ई – उपस्थित होते.
जगात उल्कापातामुळे तयार झालेली तीन सरोवरे आहेत, त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व संबंधितांची लवकरच बैठक घेऊन महोत्सवाची तारीख व वेळ घोषित करण्याचे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

