मुंबई गोवा महामार्गानजीक असलेले एक प्रमुख शहर म्हणजेच ‘रत्नागिरी’… या शहराला ‘रत्नागिरी’ हे नाव तिथे असलेल्या किल्याच्या नावाने पडलं असं म्हटलं जातं. या किल्ल्याची म्हणजेच रत्नदुर्गाची माहिती.
रत्नागिरी शहरापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर सागर किनारी उंच डोंगरावर पुरातन असा रत्नदुर्ग वसलेला आहे. ‘भगवती किल्ला’ , ‘रतनगड’ या नावाने देखील ओळखला जाणारा हा रत्नदुर्ग’ शिलाहार राज्याच्या कारकिर्दीत, राजा भोज याने इ. स. १२०५ मध्ये बांधला असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
रत्नदुर्गाच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूंना दोन भल्यामोठ्या हत्तीवर स्वार असलेल्या मावळ्यांचे शिल्प नजरेत भरते. या प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे लहानसे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर थोड्याच अंतरावर सुबक बांधणीचे श्री देवी भगवतीचे शिवकालीन भव्य मंदिर आहे. मोठा सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना असून गाभाऱ्यात अडीच ते तीन फूट उंचीची देवी भगवतीची मूर्ती आहे. चांदीचा तांदळा असलेल्या मूर्तीमागे सोनेरी प्रभावळ आहे. दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवासह अनेक सण उत्सव येथे भक्तिभावाने साजरे केले जातात. भगवतीदेवीच्या मंदिराचा तीन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक सांगतात. रत्नदुर्ग किल्ला परिसरातील दुर्गादेवी मंदिर ही मिळकत दानशूर श्री. भागोजी शेठ बाळोजी कीर कुटुंबियांची खाजगी मालमत्ता आहे. तसे दर्शविणारा फलक दर्शनीय तटभिंतीवर लावलेला आहे.
भगवती देवीच्या मुख्यमंदिरासमोरच एका दीपमाळेच्या जवळ ‘सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे’ यांचा अर्धकृती पुतळा दिसून येतो. भगवती देवीचे दर्शन घेऊन समोरच असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारण्याचा मोह आपण आवरूच शकत नाही. थोडं पुढे चालत गेल्यावर बसक्या बुरुजावर उभारलेला एक उंच स्तंभ नजरेस पडतो….
घोड्याच्या नालेच्या आकाराचा आणि एकशेवीस एकर क्षेत्रफळ असा विस्तीर्ण परिसर लाभलेल्या या किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेलं आहे. बालेकिल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत हा किल्ला विभागला गेला आहे. गाडी रस्त्याने आपल्याला खाजगी वाहनाने किंवा रिक्षाने किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जाता येते. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंतच भाविक आणि पर्यटकांसाठी खुले ठेवले जाते. याच वेळेत भाविक आणि पर्यटकांना किल्ला परिसरात प्रवेश दिला जातो.
किल्ल्यावरील भगवती मंदिर, विहीर, भुयार ही वैशिष्ट्ये बघत असतांनाच गडावरून अथांग पसरलेल्या सागरात विहार करणाऱ्या बोटी आपले लक्ष वेधून घेतात. तटबंदीच्या खाली खडकांवर आदळणाऱ्या समुद्राच्या पांढऱ्याशुभ्र लाटांचं मनोहारी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत ड्रोण कॅमेराच्या माध्यमातून पोहचवत आहोत. गडावर राहण्याची किंवा जेवण्याची सोय होऊ शकत नाही मात्र बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या उपाहारगृहात न्याहारी आणि चहापानाची छान व्यवस्था होते. रत्नागिरी शहरात निवास आणि भोजनाची उत्तम सोय होऊ शकते.
अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्याशिवाय कोकण ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. रत्नागिरीला गेल्यावर या किल्ल्याला अवश्य भेट द्या.…… Mahaparyatan.com