सातारा आणि रत्नगिरी जिल्ह्यांना जोडणारा साधारण १५ किलोमीटर लांबीचा कुंभार्ली घाट.
कुंभार्ली घाट
सातारा आणि रत्नगिरी जिल्ह्यांना जोडणारा साधारण १५ किलोमीटर लांबीचा हा कुंभार्ली घाट दळणवळणासाठी मुख्य रस्ता म्हणून गणला जातो. चिपळूण – कऱ्हाड मार्गावर असलेला कुंभार्ली हा एक मोठा आणि अवघड घाट म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील समन्वयाचा, संस्कारांचा, दळणवळणाचा व व्यापाराचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेला हा घाट अनेक वळणे घेऊन कोयना मार्गाचे दर्शन घडवतो.
परमहंस श्री ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी या घाटाची निर्मिती केली असं मानलं जात
कराडहुन कोकणात उतरण्यासाठी अंदाजे ३०० वर्षांपूर्वी परमहंस श्री ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी या घाटाची निर्मिती केली असं मानलं जात . यामुळेच कुंभार्ली घाटाला ऐतिहासिक महत्त्व हि आहे. त्याकाळी दळणवळणाचे मुख्य केंद्र म्हणून हा घाट रस्ता गणला जायचा. चिपळूण ही मोठी बाजारपेठ असल्याने चिपळूण व पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये पूर्वी मालाची बैलगाडीच्या माध्यमातून मंगलोरी कौले, मासे, भात किंवा अन्य जीवनावश्यक वस्तूंची देवाणघेवाण होत असे.
भर पावसातला कुंभार्ली घाट
पावसाळ्यात पर्यटकांसाठी नयन मनोहारी पर्वणी घेऊन येणाऱ्या या घाटाचे वैभव काही औरच आहे. या काळात सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरवी शाल पांघरलेली दिसून येते. उंचच उंच काळेकभिन्न कातळकडे म्हणजे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र. उंचच उंच डोंगरावर पडणारा पाऊस, अनेक ठिकाणी कातळातून कोसळणारे धबधबे, घाटात पसणाऱ्या धुक्याचे साम्राज्य प्रवाशांना खिळवून ठेवणारे असेच असते . सर्वांना हवाहवासा वाटणारा असा हा निसर्गरम्य घाट पावसाळ्यात तेथील नितांत सुंदर वैभवाने अधिकच खुलतो. कराडहुन येतांना कुंभार्ली घाटाच्या मध्यावर असलेल्या उत्तरतीच्या एका अवघड यु टर्न वळणावर सोनपात्राचे मंदिर आहे. घाटावरुन खाली येताना किंवा घाट चढून गेल्यावर अनेक खासगी गाड्या येथे सोनपात्राच्या मंदिरात दर्शनासाठी थांबतात. या घाटाच्या जडणघडणीत सोनपात्राचे मोठे योगदान आहे असे इथले धनगर भाविक मानतात .
पर्यटकांचे आकर्षण – गरमागरम भजी, चहा, नाश्ता, जांभळे, करवंद, कोकण मेवा आणि मक्याची कणसे
मुसळधार पावसाचा आनंद घेता घेता अनेक ठिकणी असलेल्या गरमागरम भजी, चहा, नाश्ता, जांभळे, करवंद, कोकण मेवा आणि मक्याच्या कणसाच्या छोट्याछोट्या ठेल्यांकडे प्रवाशांची पावले आपोआप वळतात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी या घाटात आता पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. घाटातील नयनरम्य दृश्य, फेसाळणारे धबधबे, विविध रंगात फुलणारी रानफुले पर्यटकांचे मन नक्कीच आकर्षूण घेतात.
Monkeys of Kumbharli Ghat – Video
कुंभार्ली घाटातील वानरसेना
कुंभार्ली घाट चढताना घाटाच्या मध्यभागी गेल्यावर वानरांचा कळप आपल्या कुटुंबकबिल्यासह उत्साहात फिरताना प्रवाशांच्या नजरेस पडतो. लहान पिलू उराशी बाळगून वानरीन बिनधास्त उड्या घेत असते. या मर्कटलिला पर्यटकांचे व प्रवाशांचे मनोरंजन करतात. अनेक प्रवासी व पर्यटक या वानरांना खाऊ घालत असल्याने ते येथेच विसावतात. माकडे शाकाहारी असल्याने झाडाची पानं, फुलं, फळं हा त्यांचा आहार. एकमेकांच्या अंगावरील किडे निवडणं हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो. त्यांचं सरासरी आयुष्य १६ ते २० वर्षं असतं. माकड अथवा वानरांकडे केवळ चेष्टेचा विषय म्हणून न बघता त्यांच्या संवर्धनासाठी आपणही पुढे येण्याची गरज आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणारी जंगलं हि बाब गंभीर झाली असून त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन्यप्राणी वाचवायचे असतील जंगलांचं संवर्धन हा एकमेव उपाय आहे. माकड अथवा वानरांकडे केवळ चेष्टेचा विषय म्हणून न बघता त्यांच्या संवर्धनासाठी आपणही पुढे येण्याची गरज आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणारी जंगलं हि बाब गंभीर झाली असून त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन्यप्राणी वाचवायचे असतील जंगलांचं संवर्धन हा एकमेव उपाय आहे.