सहा नद्यांच्या एकत्रीकरणातून जिल्ह्याला सुजलाम सुजलाम करण्याचा ध्यास…. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती जिल्ह्यात दहा मोठ्या व चौदा लहान अशा चोवीस नद्या वाहतात. या सर्वच नद्या मध्यम सपाट भागातून उत्तर दक्षिण वाहतात. जिल्ह्यातील पेढ़ी, पूर्णा, पिली, चंद्रभागा, शहानूर या नद्या तापीला मिळतात तर वर्धा नदी पूर्वेकडे वाहून प्राणहिता नदीला मिळते. असे असले तरी दरवर्षी भुजल पातळी कमी होत असल्याने व काही तालुक्यांमध्ये पाण्याची कमतरता असते तसेच कमी पावसामुळे काही धरणे, बंधारे कोरडे राहतात. जिल्ह्यातील तापी, पूर्णा, पेढी आणि गोदावरी खोऱ्यात वाहणाऱ्या या नद्यांना जोडणाऱ्या योजनेला जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या मार्गदर्शनात गती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीला दर २५ वर्षानंतर पूर येत असल्याची आतापर्यंतच्या नोंदी आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुके ड्रायझोन असून चांदूरबाजार व अचलपूर तालुके अतिशोषित आहेत. भातकुली, दर्यापुर, अंजनगावसुर्जी तालुके खारपान पट्टयातील आहेत. केंद्र सरकारच्या जलशक्ति अभियानाअंतर्गत या तालुक्यांची निवडही झालेली आहे, मात्र यावर पाहिजे त्या गतीने काम होत नाही. परिणामी जिल्हयात दुष्काळाचे सतत सावट असते. जिल्हयात ७० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक संत्रा लागवडखाली आहे. जिल्हयात वेळेवर पाऊस येत नसल्याने संत्रा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली हे तीन तालुके खारपाणपट्ट्यातील आहेत. जिल्हयातील सहाही नदीचा परिसर मध्यम सपाट उंचीच्या भागाचा आहे. सर्वच नद्यांचे पाणलोट क्षेत्र भिन्न असल्याने एकाच वेळी सर्वच नद्यांना पूर येत नाही. शिवाय तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात तापीचे पाणी अचलपुर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे.
पश्चिमवाहिनी पेढी, पूर्णा, पिली, शहानूर, चंद्रभागा या नद्या पुढे तापीला तर पूर्ववाहिनी वर्धा ही प्राणहिता व नंतर गोदावरीला मिळते. पूर्वेकडील राजुरवाडी (ता. तिवसा) येथील वर्धा नदी व पश्चिमेकडील शहानूर नदी (ता. अचलपूर) यांचे एका आडव्या रेषेत सर्वात कमी अंतर आहे. या रेषेला छेदून पेढी, पूर्णा, पिली व चंद्रभागा नद्या वाहतात. त्या एकसमान जलपातळीच्या कालव्याने एकमेकांना जोडल्यास सर्व नद्या आपापल्या क्षमतेने किंवा बारमाही समान वाहून पूरपरिस्थितीत नियोजन होऊ शकते.
परिणामी अतिशोषित व ड्रायझोन तालुके आणि खारपाणपट्ट्यातील अंजनगावसुर्जी, दर्यापूर व भातकुली अशा सहा तालुक्यांना फायदा होऊ शकतो. जलशक्ती अभियानांतर्गत व्यवहार्यता तपासणीसाठी सकारात्मक शास्त्रोक्त अभ्यासाची आवश्यकता असून या अनुषंगाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिका-यासोबत चर्चा करुन प्रकल्पाद्वारे अचलपूर मतदार संघासह अमरावती जिल्ह्याला या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकल्पाचा लाभ
जिल्ह्यातील नद्या वर्धा, पूर्णा, सपन, चंद्रभागा, शहानूर, शक्ती, पेढी, गडगा, बेंबळा, तापी (मोठ्या), चारगड, भुलेश्वरी, कोल्हाड, भानामती, नाद, विदर्भा, भोगवती, रायगड, बेला, जिनवा, दाटफाडी, पाक, चुडामन, बिच्छन, बोट, वादी, बुटी, बोदील, सिपना, खापरा, स्वारू, वान, डोलारा, देवना (लहान) संत्राबागांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) वरुड -२१,३४६, चांदूरबाजार – ११.१९६, मोर्शी ११,२२५, तिवसा – ३०७५, अचलपूर – ११,१९७, अंजनगावसुर्जी – ५,४१२ एवढे आहे. तापी महाकाय पुनर्भरणची जोड प्रस्तावित तापी महाकाय पुनर्भरण योजनेच्या डाव्या कालव्याद्वारे तापीचे पाणी इच्छापूर येथून अचलपूर तालुक्यात येईल. त्याला संभाव्य कालवा जोडला जाऊ शकते.
असे आहे नियोजन
वर्धा नदीवर राजुरवाडीपासून शहानुर नदी ही सर्वात कमी अंतराच्या एका रेषेत एका जलपातळीत जोडल्यास त्याला छेदून जाणाऱ्या या जिल्ह्यातील सहा नद्या या बारमाही वाहु शकतात, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, खारपाण क्षेत्रात गोडपाणी बारमाही उपलब्ध होऊ शकते. ड्रायझोन तालुक्यात व अतिशोषित तालुक्यात भूगर्भीय जल पातळीत वाढ होऊ शकते. धोक्यात आलेले संत्रा क्षेत्र व संत्रा उत्पादक कोरडवाहू शेतकरी संकटापासून वाचविले जाऊ शकतात. या प्रकल्पासाठी वर्धा (राजुरवाडी) ते शाहनूर (अंजनगावसुर्जी) एवढी लांब व केवळ 100 मीटर रुंद जमीन संपादित करावी लागेल. त्यापैकी 60 मीटर रुंद कालवा, दोन्ही बाजूला प्रत्येकी 15 मीटर मातीची भींत तसेच भिंतीपासून प्रत्येकी 5 मीटर संरक्षित क्षेत्र ठेवून प्रकल्प साकारला जाऊ शकतो. तापी नदीचे पाणी अचलपूर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा शहानूर नदीजोड प्रकल्प राबविल्यास संपूर्ण परिसर ‘ सुजलाम सुफलाम ‘ निश्चित होऊन शेतकऱ्यांची “आजीवन” आर्थिक भरभराट होईल. जिल्हयातील लाखो नागरिक शेतकरी यांच्या हिताचा महाकाय नदीजोड प्रकल्प “सकारात्मक दृष्टिकोणातून राबविण्यासाठी आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रकल्पाचे स्वरूप
मौजे खारीया, घुटीघाट, ता धारणी येथे वळण बंधारा बांधकाम करणे, मुख्य बंधा-यांची लांबी 1.28 किमी बंधा-यांची उंची 22 मीटर, 15 x12 मीटरचे 22 दरवाजे. प्रकल्पाची एकंदर किंमत 10,700 कोटी, बुडीत क्षेत्र मध्यप्रदेश 1495 हेक्टर व महाराष्ट्र 2288 हेक्टर (खाजगी 1621 हे. + शासकीय 338 हे + 323 हे.+ वनजमीन, पाणीसाठा 235.60 दलघमी, पाणी वापर महाराष्ट्र 19.37 टी.एम.सी व म.प्र. 11.76 टी एम सी, या योजनेतून पूर्नभरणाव्दारे अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष फायदा महाराष्ट्रातील 2,34,706 हेक्टर व म.प्र.तील 1,23,082 हेक्टर असे एकुण 3,57,788 हेक्टर ला होणार आहे. वळन बंधात्यावरुन उजवा कालवा 221 किमी (म.प्र.करीता) व डावा कालवा धारणी ते इच्छापूर व जोडबोगदा ते अचलपूर एकुण 276 किमी प्रस्तावित आहे. सदर योजनेचे सर्व्हेक्षण व अन्वेषण जवळपास पूर्ण झालेले असनू त्वरीत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही गाव बाधीत होत नसून पूर्नवसनाची आवश्यकता राहणार नाही यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सिंचन क्षमतेमध्ये वाढ
पावसाळयात तापी नदीचे पुराचे पाणी म.प्र. तसेच डाव्या कालव्याव्दारे महाराष्ट्रातील धारणी, अचलपूर पर्यंत नदी नाल्यात सोडून, भुमीगत बंधारे, गॅबीरीयन बंधारे, पुर्नभरण विहीरी, पुर्नभरण दंड, (शाफर) इंजेक्शन वेलस व साठवन बंधारे बांधुन पुर्नभरण करुन खोल गेलेली भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावणे व निर्माण होणात्या पाणी साठयाव्दारे सिंचन क्षमता वाढविता येतील.