रणरणत्या उन्हात कोरडा पडलाय ! घशाला थंडावा देणाऱ्या उसाच्या रसाचा आधार घ्या, रस काढण्यासाठी लाकडी चरकाचा वापर केल्याने मिळतो शुद्ध रस, जोड धंदा म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पसंती
उन्हाळ्यात प्रचंड उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना दिलासा मिळण्यासाठी अनेकजण इतर शीतपेयांपेक्षाची आलं, लिंबू घातलेल्या उसाच्या रसालाच अधिक प्राधान्य देतात. उसाचा रस तयार करण्यासाठी सध्या सर्रास इलेकट्रीकवर चालणार्या लोखंडी मशिनचा वापर केला जातो. विद्युत यंत्राच्या साहाय्याने काढल्या गेलेल्या रसापेक्षा बैल जुंपलेल्या लाकडी चरकातून जो रस बनवला जातो, त्याची चव हि न्यारीच असते असा अनुभव असल्याने आजही लाकडी चरकापासून बनवलेल्या रसाला अधिक मागणी असते.
महापर्यटनची टीम आपल्या चित्रीकरणाचा कोकण दौरा आटोपून परत येत असतांना नगर औरंगाबाद महामार्गावर आम्ही अश्याच एका रसवंतीवर थांबून बर्फ विरहित, आलं लिंबू घातलेल्या उसाच्या रसाचा स्वाद घेतला. एक ऊस उत्पादक शेतकरी रावसाहेब वाघमारे आपल्या लवंगी नावाच्या लाडक्या बैलास चरकाला जुंपून दोघेही मिळून ताजा शुद्ध उसाचा रस काढत होते. सहज माहिती घेत असताना अशी माहिती मिळाली कि लवंग्या हा एका दिवसाला अंदाजे ३०० ग्लास रस काढतो . हजरो रुपये रोज कमावणारा हा फक्त अडीच वर्षे वय असणारा लवंगी परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
पीळ पाडलेल्या दोन लाकडांच्या ओंडक्यामध्ये ऊस घालून मग रस तयार होतो. ओंडके फिरवण्यासाठी त्या वर लाकडी दांडके बसवलेले असतात. या दांड्याला बैल जुंपला जातो. बैलाला वर्तुळाकारात फिरवले की ओंडके फिरायला लागतात. त्यामध्ये ऊस घातला की उसाचा रस तयार होतो. रस काढल्यावर उरलेले उसाचे चिपाड हे पाळीव जनावरांना खाण्यासाठी दिला जात असल्याने वाया जात नाही. अनेक ऊस उत्पादक शेतकरी उसाच्या उत्पन्नाचा काही भाग कारखान्यांना विकून काही भाग चारकाचे रसवंतीगृह चालवून त्यातून अधिक नफा मिळवण्याला प्रधान्य देतात. काही शेतकरी चरकासह लाकडी गाडी घेऊन त्यावर चरक बसवतात आणि गल्ली बोळात हा गाडा फिरवून ग्राहकांना उसाचा रस घरपोहोच देतात.