वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या या क्षेत्राची संपूर्ण माहिती…
पंढरपूर हे भारतातील एक महान तीर्थक्षेत्र आहे. प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक येथे येतात व विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घेतात. पंढरपूरचा ज्ञात इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. पद्म पुराणात कथा आहे, की रुख्मिणी कृष्णावर रुसून दिंडीर वनात येऊन तप करू लागली. कृष्ण तिला शोधत आले. मात्र ते प्रथम भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी गेले. तो आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. त्यानं वीट फेकली व कृष्णाला त्यावर उभ राहण्यास सांगितलं. तो विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला. दिंडीर वन म्हणजेच पंढरपूर, रुक्मिणी जिथं तप करीत होती तिथंच ती उभी आहे. म्हणून विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरं येथे स्वतंत्र आहेत.
पंढरपूरला आल्यावर वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतात. ‘पंढरीचा वारकरी चंद्रभागेस्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥’ असा विधी आहे. भीमा नदी इथे चंद्राकार वाहते. म्हणून तिला इथे चंद्रभागा म्हणतात. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. त्याच्यासमोर लोहदंड तीर्थ आहे. तिथं स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते. त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते. वाळवंटात अनेक संतांच्या समाध्या आहेत.
पुंडलिकाचं दर्शन करून महाद्वार घाटानं वारकरी महाद्वारात येतात. मंदिराच्या बाहेर संत चोखामेळाची समाधी आहे. संत नामदेवांनी मंगळवेढ्यावरून त्यांच्या अस्थी आणून विठ्ठलाच्या आदेशावरून मंदिराच्या द्वारात ही समाधी बांधली. तिथं नमस्कार करून मग वारकरी मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात. पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात. इथे नामदेवांच्या घरातील चौदा लोकांनी समाधी घेतल्याची कथा सांगितली जाते. इथे संत नामदेवांचा पितळी मुखवटा आहे. त्याला नमस्कार करून भक्त पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतात. हा सभामंडप लाकडी असून उंच व भव्य आहे. त्यात दगडी दीपमाळ, गरुड हनुमंत, दत्त यांची मंदिरं आहेत. समर्थ रामदासांनी प्रतिष्ठापित केलेला उभा मारुती आहे. तसंच संत प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.
तिथून वारकरी पायऱ्या चढून विठ्ठलाच्या हेमाडपंती दगडी मंदिरात येतो. तिथं एका खांबाला चांदी मढविलेली आहे. त्याला गरुड खांब’ म्हणतात. या खांबाला भक्त आलिंगन देतात. त्याच्याच शेजारी गोल शिळा आहे, तिला रंगशिळा म्हणतात, संत नामदेव तिथं उभे राहून कीर्तन करीत असत. त्याच्या छतावर सुंदर व रेखीव मूर्ती आहेत.
येथून वारकरी आतल्या चौखांबी मंडपात जातो. तिथं प्रवेशद्वारावर पुन्हा जय-विजय आहेत. उत्तरेला संत भानुदास महाराजांची समाधी आहे. आतल्या मंडपात उत्तरेला शेजघर आहे व आत गाभारा आहे. त्यात चांदीने मढविलेल्या सिंहासनावर मेघडंबरीत श्री विठ्ठलाची सुंदर मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी आहे. कंटाळवाणा प्रवास करून, तासन्तास रांगेत उभा राहून श्रमलेला भाविक जेव्हा विठ्ठलासमोर नतमस्तक होतो, तेव्हा त्याचा सारा थकवा एका क्षणात नाहिसा होतो, त्याच्या अंगावर रोमांच उभारतात. भक्तिरस उचंबळतो व नेत्र पाझरू लागतात. संतांची वाणी अनुभवाला येते. ‘तुझे पायी सुख सर्व आहे!’ आचार्य विनोबा भावे सुद्धा अश्रू ढाळीत भावविभोर अवस्थेत पांडुरंगापुढे उभे होते…..
पांडुरंगाच्या दर्शनानंतर भक्त श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जातो. श्री राधिका, सत्यभामा देवींचं दर्शन घेऊन तो रुक्मिणीच्या गाभान्यात प्रवेशतो. तिथे चांदीन मढविलेल्या उंच सिहासनावर श्री रुक्मिणीची सुंदर, सुबक, आल्हाददायी मूर्ती आहे. मूर्ती शाळिग्राम पाषाणाची असून अत्यंत रेखीव आहे.
श्री रुक्मिणीचं दर्शन झाल्यावर श्री रुक्मिणीच्या मंडपात भाविक येतो. तिथे प्रख्यात चित्रकार श्री. कल्याण शेटे यांनी काढलेली श्री रुक्मिणी स्वयंवरावरील अप्रतिम, सुंदर, चित्रमालिका पाहण्यात भाविक गुंग होऊन जातो.
आषाढी कार्तिकी भक्तजन येती – पंढरपूरचा महिमा संतांनी वाढविला. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यात पांडुरंगाचे महान भक्त होऊन गेले. त्यामुळे या राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरला वारीसाठी येतात. विशेषतः कानडी भक्त मोठ्या संख्येनं पंढरीच्या वारीला येतात. पूर्वी पंढरपूर कर्नाटकातच होतं. ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. ‘कानडा विठ्ठलू कर्नाटकु.
वर्षातून चार वेळा इथे मोठ्या वाऱ्या भरतात. सर्वात मोठी वारी आषाढी एकादशीला असते. या वारीला ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, गजानन महाराज आदि संतांच्या पालख्या येतात. त्यात शेकडो दिंड्या व हजारो वारकरी भजन करीत चालत येतात. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या दिंडीबरोबर लाखो वारकरी चालत येतात.
पंढरीला आल्यावर चंद्रभागेचं स्नान, दिंडीत भजन करीत नगर प्रदक्षिणा होते. प्रचंड गर्दीमुळे सर्वांनाच दर्शन घेता येत नाही. त्यामुळे भाविक फक्त शिखरांचं दर्शन घेतात. परंपरेनं चालत आलेल्या आपल्या मठात भजन करतात, कीर्तन ऐकतात. द्वादशी सोडून गावी परततात. काही जण वद्य प्रतिपदेपर्यंत येथेच राहतात. पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला होतो व प्रतिपदेला मंदिरात महाद्वार काला होतो. नंतर नियमाचे वारकरी परत जातात.
आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रा भरते. कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आषाढीप्रमाणेच कार्तिकी वारी ही होते.
त्यानंतर माघ व चैत्र महिन्यात लहान यात्रा भरतात. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला यात्रा भरते. वर्षातून अंदाजे एक कोटी लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. वाहतुकीच्या सोईमुळे व रेल्वे ब्रॉडगेज झाल्यामुळे यात्रा वाढत आहे…. साभार मस्त भटकंती
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन