मोठे उद्योग नसल्याने मोसमाच्या शेवटी लाखो टन फळे जात आहेत वाया

राज्यात वाईन तयार करण्याचे कुटिरोद्योग सुरू व्हावेत ; शासनाने जाचक नियम बदलले तर क्रांती घडेल महाराष्ट्रात. नाशिवंत फळांपासून घरगुती (Home made) वाईन उत्पादनास शासनाची परवानगी मिळाल्यास शेतकरी होणार मालामाल ; नवीन पर्याय करून बघायला काय हरकत आहे…….
महाराष्ट्रासह कोकणात उत्पादित होणाऱ्या फळांवर प्रक्रिया करण्यासाठी मोठे उद्योग नसल्याने मोसमाच्या शेवटी लाखो टन फळे दरवर्षी वाया जातात. नाशिवंत फळांपासून वाईन तयार केल्यास शेतकऱ्यांना त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल. या उदात्त हेतूने प्रेरित होऊन दापोली तालुक्यातील कोळथरे येथील प्रयोगशील शेतकरी माधव महाजन हे गेल्या वीस वर्षांपासून याविषयी संशोधन करीत आहेत. त्यांनी आजतायागत निरनिराळ्या १८ फळांपासून प्रायोगिक तत्त्वावर वाईन म्हणजेच आसव तयार केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षापासून बनविल्या जाणाऱ्या वाईन निर्मितीच्या धर्तीवर उर्वरित महाराष्ट्रासह कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडं, करवंद, जांभूळ, फणस यासह बहुतेक सगळ्याच फळांपासून वाईन बनवण्यास परवानगी मिळाल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा महाजन यांना आहे.
राज्यात वाईन तयार करण्याचे कुटिरोद्योग सुरू व्हावेत, शासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, वार्षिक परवाना शुल्कात सवलत मिळणे, वाईन उद्योग उभारणीसाठी लागणारी जागा अकृषी करण्याची गरज नसावी, याला गृहउद्योग समजाला जावा, विशिष्ट मर्यादेत वाईन तयार करण्यास कोणत्याही जाचक अटी घातल्या जाऊ नयेत यासाठी कोळथरे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी माधव काका महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. कायद्याने स्वतःसाठी पन्नास लिटर वाईन आपण घरी करू शकतो (विक्रीसाठी नाही). राज्यात टपरीवर मिळणारा लाखो लिटर चहा दररोज प्यायला जातो. आपल्याकडे पाहुणे आल्यास आपण त्यांना चहा आपण देतो ही परंपरा आहे. मात्र चहात शून्य पोषणमूल्य असल्याने चहा ऐवजी थर्टी / सिक्स्टी पौष्टिकमूल्य असलेली वाईन प्यायला द्या ! असा अजब सल्ला माधव काका देतात. पण असा सल्ला देण्यामागचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा. तुम्ही म्हणाल, काय फेकता राव याच्यात शेतकऱ्यांचा फायदा कसा, असा प्रश्न त्यांना विचारल्यास त्यांनी दिलेले उत्तर आपल्याला नक्कीच अंतर्मुख करून जाते.
ज्या वेळेला कोणत्याही फळाला उदाहरणार्थ फळांचा राजा हापूस आंबा, बहराच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारीत हापूसला हिऱ्याचा दर, मार्च महिना आला की सोन्याचा दर, एप्रिल आला चांदीचा दर, मे महिना आल्यास मातीमोल भावात हापूस आंब्याची विक्री होत असते. दहा पंधरा रुपये किलो दर हापूसला मिळतो तो पण कॅनिंगवाले घेतात म्हणून, अशा वेळी काय करायचे ? लाखो टन फळे विक्रीअभावी सडून जातात, याला पर्याय काय ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. रसाचे डबे भरून झाले, लोणची घालून झाली ; नाना प्रयोग करून लोकं थकली आहेत. मग हा नवीन पर्याय करून बघायला काय हरकत आहे ?
महाराष्ट्रातील कोठलेही फळ कितीही सोन्याच्या दरात विकलं जात असलं तरी एक दिवस असा येतो की ते फळ झाडावरून काढायला परवडत नाही. अशावेळी या वाया जाणाऱ्या फळांपासून वाईन म्हणजेच आसवची झिरो बजेट मध्ये आणि घरच्याघरी निर्मिती केल्यास ती सगळ्यांनाच फायदेशीर ठरू शकते. ही फळ प्रक्रियाच आहे. कोठल्याही शेतकऱ्याला त्यांच्या फळांवर पर्यावरणपूर्वक प्रक्रिया करून बघायला काय हरकत आहे ? आमचा हक्कच आहे तो. आमचे उत्पन्न वाढवणारी फळप्रक्रिया जी पौष्टिक पेय निर्माण करू शकते, ती करण्यास कसली भीती ? घाबरू नका हळूहळू कायदा बदलावा लागेल.
माधवकाका महाजन यांचे नेमके काय म्हणणं आहे ? त्यातील ठळक मुद्दे –
मुळात मी दारूच्या विरोधी माणूस आहे. मी पित नाही आणि लोकांनी पण पिऊ नये या मताचा मी आहे. मी खात्रीनं सांगू शकतो की दारू ऐवजी वाईन प्या. दारूचे जे दुष्परिणाम आहेत की लोक दारुडे होतात, बायका मुलांचे हाल होतात, संसार उध्वस्त होतात, नोकरीधंदा धड नाही असं होऊन जातं. असे कुठलेही दुर्गुण या वाईन मध्ये नाही.
- आयुर्वेदिक आसव आणि वाईन ही एकच वस्तू आहे. वाईनमध्ये जर १२ ते १४ टक्के वाईन अल्कोहोल असते म्हणून जर तिला तुम्ही दारू म्हणत असाल तर आसवांना ही तेवढेच अल्कोहोल असते हे तुम्ही तपासून बघा.
- गल्लीबोळात आसव विकलं जावं, असं शरद पवार म्हणतात मग, वाईनला तुम्ही का दारू दारू म्हणून मारताहेत. दारू म्हटलं की कुठलीही ग्रामपंचायत एन ओ सी द्यायला तयार होत नाही. मूळ अडचण ही आहे .
- वाईनला खाद्यपदार्थाचे नियम लावून टाका. जिथे सरबत विकलं जातं तिथे वाईन विकली गेली पाहिजे.
- हजारो शेतकरी उत्सुक आहेत वाईन करायला, सरकारने जर जाचक नियम बदलले तर क्रांती घडेल महाराष्ट्रात.
- मला पाशा पटेल यांनी दिल्लीपर्यंत नेलं गडकरींकडे एक्साईज साठी. आता एक्साईज कमी झालं समजा, मात्र एक्साईज गेल्यानंतरही जे काही नियम अडचणीचे आहेत.
- हजारो टन काजू बोंड वाया जात आहे, गोव्यात फेणीला परवानगी असेल तर तुम्ही पौष्टिक, गुणकारी आणि औषधी असलेल्या वाईनला परवानगी द्या.
आज शुगर फ्रीचा जमाना आलाय आणि आमची फळे सेंद्रिय असल्याने झिरो शुगर वाईनची निर्मितीही शक्य आहे.
८० टक्के पाणी पिणाऱ्या उसाला डोक्यावर घेऊन नाचतायेत, पाच पाच हजार कोटींचे अनुदान फुकट वाटताहेत, आम्हाला काय देताहेत. आम्ही मागतच नाही काही, आम्हाला पॅकेज देऊच नका. व्हॅट / जीएसटीच्या स्वरूपात आम्हीच सरकारला कर देतो. आम्हाला आमच्या हक्काचे नियम मात्र बदलवून द्या.
‘परवाना घेऊन उद्योग करणं’ खरी अडचण इथे आहे. सगळ्यात लहान टप्पा म्हणजे मायक्रो वायनरी प्रकल्प हा दोन लाख लिटर पासून सुरु होतो. इंडस्ट्रियल एन ए करा, फायर आणि पोल्युशनचे सर्टिफिकेट आणा, हे नियम सगळे जाचक असल्याने ते शिथिल करण्यात यावे. दोन लाख लिटर वाईन निर्मिती करण हे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात नक्कीच नाही. मला माझ्या गावात दोन हजार लिटरच करायची आहे मग माझ्यासाठी नियम नकोत का ?
दि. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात वाईन उद्योगात येणाऱ्या अडचणींवर उहापोह करण्यासाठी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली वाईन निर्मितीत संशोधन करणाऱ्या आणि बागायतदार शेतकऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात माधव महाजन यांनी आपली भूमिका मांडली होती. शेतकऱ्यांना विविध फळांपासून वाईन बनवण्याचा मार्ग मोकळा असल्याची माहिती पाशा पटेल यांनी या वेळी दिली होती. शासनाने हे धोरण जर अमलात आणलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे …… माधवकाका महाजन, कोळथरे ता. दापोली, जि. रत्नागिरी. यांनी “महापर्यटन” ला दिलेली माहिती
Subscribe MAHAPARYATAN on Youtube – https://www.youtube.com/user/kuldaivatdarshan
Follow & like us on Facebook – https://www.facebook.com/Mahaparyatan-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-626681754850154/
