दापोली तालुक्यातील कोळथरे या गावात प्रामुख्याने सुपारी हे पीक घेतले जाते. परंतु दिवसेंदिवस या ठिकाणी मजुरांचा प्रश्न वाढत चालला आहे. गावात मजूर मिळणे कठीण झाले आहे. या गावात 40 ते 50 सुपारी पिकवणारे शेतकरी आहेत. मजुरांच्या तुटवड्यावर या गावातील शेतकऱ्यांनी एक तोडगा म्हणून सुपारीतील पाणी कमी करणारे म्हणजे सुपारी चे सोडे काढणारे यंत्र बनविले आहे.

या यंत्राची किंमत ही प्रत्येक शेतकऱ्यांना परवडेल इतकी कमी आहे. पीठ दळणाऱ्या चक्की सारखी दिसणारे हे यंत्र शेतकऱ्यांचे पैसे आणि श्रम दोन्ही वाचवते. ओल्या सुपारीच्या आवरणातून पाणी निघणे महत्वाचे असते, या प्रक्रियेला महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. या यंत्राच्या साहाय्याने 15 ते 20 दिवस चालणारे काम एक ते दोन दिवसात होते. यात प्रत्येक शेतकऱ्यांचे 15 ते 20 हजार रुपये मजुरीत बचत होते.
या यंत्रांचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना देखील व्हावा अशी ईच्छा कोळथरे गावातील प्रयोगशील तरुण शेतकरी मंदार आगरकर यांनी व्यक्त केली आहे.
