चिरंजिव परशुराम – भगवान विष्णूंचा सहावा अवतार
कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमि आहे. प्रत्यक्षात गुजराथपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमीआहे. कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत, सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने आहेत. अनेक मंदिरे स्वयंभू स्थान लाभलेली आहेत. साऱ्या देशातून या देवभूमीत पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी भाविक येत असतात. श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे. चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत व परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तीनशे वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे.
येथे कसे जायचे – श्रीक्षेत्र परशुराम चिपळूणपासून दहा किलोमीटरवर आहे. कोकण रेल्वेचे चिपळूण हे महत्त्वाचे स्थानक असून तेथून रिक्षा करून परशुरामाला जाता येते. हे तीर्थक्षेत्र मुंबई-गोवा रस्त्यावर आहे त्यामुळे एस.टी. गाडीनेहि परशुराम नाक्यावर उतरून मंदिराकडे चालत जाता येते. स्वतःच्या गाड्या घेऊन येणारांना थेट मंदिराच्या परिसरात जाता येईल असा रस्ता नुकताच महाराष्ट्र शासनाने केला आहे. चिपळूण बस स्थानकावरून दर अर्ध्या तासाला परशुरामला यायला बसेस मिळतात.
परशुराम मंदिर इतिहास – परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले. दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषींना आणले गेले. तेच पुढे चित्त्पावन म्हणून प्रसिद्ध झाले, असे डॉ. जोग यांचे प्रतिपादन आहे. अश्वमेध, राजसूय यांसारखे सर्वांत मोठे यज्ञ केले जात. तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना यज्ञभूमीजवळ केली जात असे त्याबरोबर चारहि वेद जिच्यात सामवले आहेत, अशा वेदवासिनी किंवा विंध्यावासिनी देवीचे मंदिरहि जवळच बांधले जात असे. यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय ओळखला जातो. स्वाभाविकच यज्ञस्थळाजवळ भगवान परशुराम आणि विंध्यवासिनीबरोबर कार्तिकेयाचे मंदिरही बांधले जात असे. चिपळूणमधील वर उल्लेख केलेल्या अश्वमेध यज्ञासाठीच या तिन्ही देवतांची मंदिरे चिपळूणच्या उत्तरेला बांधण्यात आली, असे संशोधक डॉ. जोग यांचे म्हणणे आहे.
कोकणात नंतरच्या काळात वेगवेगळ्या मुस्लिम सत्तांची आक्रमणे झाली, तेव्हा इतर मंदिरांप्रमाणे ही तिन्ही मंदिरे वारंवार पाडली गेली आणि पुन्हा बांधली गेली. तरी मूर्तींचे प्राचिनत्व लक्षात येणार आहे.
परशुरामक्षेत्र – श्रीक्षेत्र परशुराम ही भगवान परशुरामांची त्यांनी निवडलेली तपोभूमी मानण्यात येते. भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या उन्मत्त सहस्त्रार्जुनाला व त्याचे पाठिराखे असलेल्या छोट्या- मोठ्या सत्तांध राजांना युध्दभूमीत पराभूत केले व शस्त्र खाली ठेवले. जिंकलेली त्या काळातील पृथ्वी त्यांनी सुजाण व सुसंस्कृत राज्यकर्त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी कश्यप मुनींना अर्पण केली. दान केलेल्या भूमीत स्वतः रहाणे योग्य नाही म्हणून परशुरामांनी कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अथांग सागराला आपल्या निवासासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याकरिता थोडे मागे हटण्याची विनंती केली. सागराने ती विनंती मान्य केली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटविला. गुजराथपासून केरळपर्यंत नवा भूप्रदेश निर्माण झाला व परशुरामांनी तपश्चर्येसाठी स्वतःकरिता महेंद्र पर्वताची निवड केली व तो पर्वत म्हणजेच चिपळूण जवळ असलेले श्री क्षेत्र परशुराम. या विश्वव्यापी श्री विष्णूच्या चिरंजीव अवताराने महेंद्र पर्वत म्हणजे कोकणातील आजचे परशुरामक्षेत्र तपश्चर्येसाठी निवड़ले. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला प्रसन्न वातावरण लाभलेले आहे. म्हणूनच हे एक श्रध्दाकेंद्र लोकप्रिय झाले आहे. मंदिर परिसरात रेणुका, गंगा माता मंदिर, गणपती आणि रामदास स्वामींनी स्थापित केलेले मारुती मंदिर आहेत.

प्रसादालय / भक्तनिवास – भगवान श्री परशुराम यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक वेगवेगळ्या गावांमधुन येतात. मंदिराजवळ न्याहारीची, जेवणाची वगैरे सोय नसल्यामुळे भाविकांना मोठी अडचण होत असे. विश्वस्त समितीच्या हे लक्षात आले व प्रसादालय ही वास्तू उभी राहीली. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना डाळ तांदुळाची खिचडी व प्रसादाचा शिरा असे रोज प्रसाद म्हणून दिले जाते. प्रसादाची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी खास उपवासाचा प्रसाद दिला जातो. महाशिवरात्र या दिवशी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. या दिवशी जवळजवळ 10 ते 15 हजार भाविकांना खास उपवासाचा प्रसाद दिला जातो. मंदिर परिसरात भक्तांच्या निवासासाठी भक्त निवासाची उभारणी करण्यात आली आहे. येथे भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था करण्यात येते.
शिवाजी महाराजांच्या काळात तेथे होते छोटेसे देऊळ – शिवछत्रपतींच्या काळात स्वयंभू स्थान व छोटेसे मंदीर होते त्याच्यासमोर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले दक्षिणाभिमुख मारुती मंदीर आहे. ब्राह्म व क्षात्र तेजाचे मूर्तिमंत रुप असलेले छत्रपति त्या काळात अनेकदा परशुरामला दर्शनासाठी येत. षोडशोपचारे पूजा करीत. देवाला उत्पन्नासाठी देणग्या देत, संभाजी राजेहि वारंवार दर्शनाला येत. राजाराम महाराज तर परशुरामांच्या व ब्रह्मेंद्रस्वामींच्या दर्शनासाठी परशुरामला मुक्काम करीत. शिवछत्रपती चिपळूणच्या रामतीर्थात स्नान करून परशुरामांची यथासांग पूजा करुन, प्रतापगडला भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन राज्याभिषेकासाठी रायगडाला गेले असे इतिहासात उल्लेख आहेत. आजहि सातारचे भोसले घराणे परशुरामांना आपले दैवत मानते.
शंभर वर्षांपूर्वी वेहेळ्यातील राजेशिर्केंना आजारपणामुळे पंढरीच्या वारीला जाता आले नाही म्हणून पांडुरंगाने स्वप्नात येऊन मी पुढील एकादशीला परशुराम दर्शनासाठी क्षेत्र परशुराम येथे येईन असे सांगितले, तेव्हापासून राजेशिर्के घराण्याची मोठी दिंडी सप्ताहासाठी परशुरामला येते.जंजि-याच्या सिद्दीने परशुराम मंदिराला काही गावे इनाम दिली. अग्निहोत्री असलेले शेकडो विदेशी नागरिक परशुराम दर्शनाला येतात.
आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीची परंपरा – शंभर वर्षांपूर्वी वेहेळ्यातील राजेशिर्केंना आजारपणामुळे पंढरीच्या वारीला जाता आले नाही म्हणून पांडुरंगाने स्वप्नात येऊन मी पुढील एकादशीला परशुराम दर्शनासाठी क्षेत्र परशुराम येथे येईन असे सांगितले, तेव्हापासून राजेशिर्के घराण्याची मोठी दिंडी सप्ताहासाठी परशुरामला येते. जंजि-याच्या सिद्दीने परशुराम मंदिराला काही गावे इनाम दिली. अग्निहोत्री असलेले शेकडो विदेशी नागरिक परशुराम दर्शनाला येतात.
अग्निहोत्री परशुराम – भगवान परशुरामांनी समुद्र मागे हटवून निर्माण झालेल्या भूमीवर शेतीसाठी काही प्रयोग केले. कोकणात शेतीकरताना जमीन पालापाचोळा, गवत ,शेणखत आदींच्या सहाय्याने भाजली जाते याला भाजावण असे म्ह्णतात. शेती करताना आजहि या पद्धतीचा अवलंब केला जातो. कोकणाशिवाय इतरत्र भाजावण होत नाही असे सामान्यपणे मानले जाते. भगवान परशुरामांनी यज्ञ संस्कृती स्थिर केली त्यामुळे पर्यावरण उत्तम राहिले व सामान्य माणसाला अग्नी निर्मितीचे ज्ञानहि झाले. या यज्ञ संस्कृतीचाच एक भाग म्हणून अग्निहोत्राची परंपरा सुरु झाली आहे. आज केवळ भारतात नव्हे तर जगभर निरनिराळ्या धर्मातील व समाज व्यवस्थेतील दशलक्षावधी अग्निहोत्री दररोज नियमितपणे अग्निहोत्र करतात आणि भगवान परशुरामाने ही परंपरा सुरु केली यावर नितांत श्रध्दा ठेवून एकमेकाच्या संपर्कात असतात. भगवान परशुरामांनी अक्कलकोटजवळील शिवापुरी येथील परमभक्त श्री गजानन महाराज यांना दृष्टांत देऊन हे कार्य चालविण्याची आज्ञा केली व महाराजांनी यज्ञ संस्कृती जगभर पोचविली. श्रीक्षेत्र परशुराम येथेहि महाराजांनी मंदिराजवळ अग्नीमंदीर उभारले आहे…. साभार – परशुराम देवस्थान संकेतस्थळ
पत्ता- संस्थान श्री भार्गवराम परशुराम.
मु.पो.परशुराम, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी., महाराष्ट्र.
पिन – 415605.
- Contacts
- फोन–02355-258381
- ई-मेल- contactus@parshuramdevasthan.org
- मोबाईल –
- श्री.शंकर कानडे –7774021100
- श्री.जयदीप जोशी–7774021094
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन