
डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
जळगाव – “महात्मा गांधी यांनी निसर्ग आणि पर्यावरण जसे आहे तसे ठेवायचा प्रयत्न करा, असे आवाहन केले होते. जैन उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांनी गांधीजींच्या विचाराच्या पुढे जाऊन दूरदृष्टीने आवाहन केले. आज आहे त्यापेक्षा अधिक चांगला निसर्ग आणि पर्यावरण भावी पिढीसाठी ठेऊन जायला हवा. भवरलालजी यांनी जसे विचार मांडले तसे ते आचारणात आणले. निसर्ग आणि पर्यावरणात वावरणाऱ्या मानवासह पशू-पक्षी-प्राणी-जीव-जंतू यांचा जगण्याचा विचार त्यांनी केला. आपल्या उद्योगाचे हेच सूत्र त्यांनी अंगिकारले.” असे प्रतिपादन एनर्जी स्वराज फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. चेतनसिंह सोलंकी यांनी ऑनलाईन व्याख्यानमालेत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर होते तर डॉ. सुदर्शन आयंगार आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची विशेष उपस्थिती होती. वेबेएक्स ॲपवर लिंकसह आणि युट्यूब आणि फेसबुकवर लाईव्ह पद्धतीने प्रा. सोलंकी यांचे व्याख्यान प्रसारित झाले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या पुढाकारात डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यान मालेचे पहिले पुष्प प्रा. सोलंकी यांनी गुंफले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय “ग्रामीण आणि कृषि स्थिरता – आवश्यकता आणि दृष्टीकोन” हा होता. आरंभी श्रद्धेय भाऊंना आवडणारी रचना ‘मेरी भावना’ ही प्रार्थना प्रस्तुत झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुदर्शन आयंगार यांनी केले. देशाच्या संस्कृतितला प्रमुख आधार शेतकरी असतो असे श्रद्धेय भवरलालजी मानायचे. जल, जमीन, जंगल आणि ग्रामविकास याबाबत मोठ्याभाऊंचे कार्याबाबत त्यांनी आवर्जून सांगितले. सोलर मॅन ऑफ इंडिया म्हणून ज्यांचा परिचय सर्वांना आहे असे प्रो. चेतनसिंग सोलंकी यांचा परिचय डॉ. आश्विन झाला यांनी करून दिला.
प्रा. सोलंकी स्वतः सौर ऊर्जेच्या वापराविषयी देशभर प्रचार-प्रसार भ्रमण करीत आहेत. सौर ऊर्जेचा वापर केल्याने पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कमी होतो आणि त्यासाठी लागणारे संसाधन निसर्गात जैसे थे राहतात. शिवाय प्रदुषणासह हवामानातील बदलांचे दुष्परिणाम संभवत नाही. पंचमहाभूत (जल, जमीन, आकाश, वायू आणि अग्नी) यांचे आजचे अस्तित्व टीकविणे किंवा त्यांचा स्तर सुधारणे यासाठी सौर ऊर्जेचा वापर करा अशी मांडणी प्रा. सोलंकी करतात.
हेच सूत्र धरून प्रा. सोलंकी यांनी श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्याचा थेट संबंध “ग्रामीण आणि कृषि स्थिरता – आवश्यकता आणि दृष्टीकोन” या विषयाशी जोडला. पंचमहाभूतानी मिळून ही जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. त्यातला पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्व. भवरलालजी जैन यांनी आपल्या दूरदृष्टीतून पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचे उच्च तंत्र आणि मंत्र शेतकऱ्यांना दिला. जगातील त्यांचे हे खूप मोलाचे कार्य आहे असा गौरवपूर्ण उल्लेख देखील प्रा. चेतनसिंह सोलंकी यांनी केला.
प्रा. सोलंकी म्हणाले, “भवरलालजी यांनीही पंच महाभुतांचा विचार उद्योग व उत्पादने निर्मितीत केला. त्यांनी शेत जमिनीची उत्पादकता वाढवायला गरजे एवढे पाणी वापरासाठी नवे तंत्र विकसित केले. पिकांची रोपे निर्मितीसाठी नवे तंत्र आणले. वृक्ष-वेली वृद्धीतून निर्मळ ऑक्सिजन निर्मितीचा पाठपुरावा केला. अग्नीला उर्जेच्या स्वरूपात मानून सौर ऊर्जा निर्मितीसाठी तंत्र विकसित केले. भवरलालजी नेहमी म्हणत, आपण हे जग अधिक समृद्ध, सुंदर व स्वच्छ करून भावी पिढीसाठी सोडून जाऊ या. त्यांनी याच विचाराने दूरदृष्टी ठेऊन कार्य केले. आज निसर्ग व पर्यावरण ऱ्हासामुळे निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचे मूळ पारंपारिक ऊर्जा निर्मितीवर वाढलेला ताण आणि त्यासाठी नैसर्गिक साधनांचा होणारा अमर्याद वापर हेच आहे. यावर जर उत्तर हवे असेल आणि आज आहे त्या स्थितीत सुधारणा हवी असेल तर भवरलाल जैन यांनी कृतीत आणलेला विचार स्वीकारून निसर्ग अधिक सुंदर करायचे प्रयत्न सुरू राहायला हवेत.” प्रा. सोळंकी यांनी अनेक संदर्भ देत निसर्ग व पर्यावरणातील आव्हाने कोणती आहेत हे सांगितले. त्यामागील कारणांचे स्पष्टीकरण देताना उपाय म्हणून भवरलालजींचा दूरदृष्टीचा दृष्टीकोनही सोप्या भाषेत उलगडून दाखवला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी देखील महात्मा गांधीजी आणि भवरलालजी जैन यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. पर्यावरण, ग्रामविकास व शाश्वतता या दृष्टीने महात्मा गांधीजी आणि भवरलालजी जैन यांनी दिलेल्या मंत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राम विकास, कृषिक्षेत्र आणि पर्यावरण याबाबत भवरलालजी जैन यांनी आपल्या हयातीत छान असे प्रारुप किंवा मॉडेल तयार केले आहे.
सध्याची परिस्थिती व जीवनामध्ये शाश्वतीच्या दृष्टीने कार्य करू शकतो याबाबत त्यांनी खूप विचारमंथन केलेले आहे, लेखन केलेले आहे. त्यांचा जीवन मंत्र आपण सर्व अवलंबू या असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अश्विन झाला यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.