परशुरामांनी तपश्चर्येसाठी स्वतःकरिता महेंद्र पर्वताची केली होती निवड

महेंद्रगिरी पर्वत म्हणजेच चिपळूण जवळ असलेले श्री क्षेत्र परशुराम
कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमि आहे. प्रत्यक्षात गुजराथपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमीआहे.कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत, सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने आहेत. अनेक मंदिरे स्वयंभू स्थान लाभलेली आहेत. साऱ्या देशातून या देवभूमीत पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी भाविक येत असतात. कोकणी माणूस अत्यंत धार्मिक तेवढाच अतिथ्यशील आहे.
श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे. चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत.
परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तीनशे वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे.
परशुराम मंदिर इतिहास – परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले. दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषींना आणले गेले. तेच पुढे चित्त्पावन म्हणून प्रसिद्ध झाले, असे डॉ. जोग यांचे प्रतिपादन आहे.
अश्वमेध, राजसूय यांसारखे सर्वांत मोठे यज्ञ केले जात. तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना यज्ञभूमीजवळ केली जात असे त्याबरोबर चारहि वेद जिच्यात सामवले आहेत, अशा वेदवासिनी किंवा विंध्यावासिनी देवीचे मंदिरहि जवळच बांधले जात असे. यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय ओळखला जातो. स्वाभाविकच यज्ञस्थळाजवळ भगवान परशुराम आणि विंध्यवासिनीबरोबर कार्तिकेयाचे मंदिरही बांधले जात असे. चिपळूणमधील वर उल्लेख केलेल्या अश्वमेध यज्ञासाठीच या तिन्ही देवतांची मंदिरे चिपळूणच्या उत्तरेला बांधण्यात आली, असे संशोधक डॉ. जोग यांचे म्हणणे आहे.
कोकणात नंतरच्या काळात वेगवेगळ्या मुस्लिम सत्तांची आक्रमणे झाली, तेव्हा इतर मंदिरांप्रमाणे ही तिन्ही मंदिरे वारंवार पाडली गेली आणि पुन्हा बांधली गेली. तरी मूर्तींचे प्राचिनत्व लक्षात येणार आहे.
परशुरामक्षेत्र – श्रीक्षेत्र परशुराम ही भगवान परशुरामांची त्यांनी निवडलेली तपोभूमी मानण्यात येते. भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या उन्मत्त सहस्त्रार्जुनाला व त्याचे पाठिराखे असलेल्या छोट्या- मोठ्या सत्तांध राजांना युध्दभूमीत पराभूत केले व शस्त्र खाली ठेवले. जिंकलेली त्या काळातील पृथ्वी त्यांनी सुजाण व सुसंस्कृत राज्यकर्त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी कश्यप मुनींना अर्पण केली. दान केलेल्या भूमीत स्वतः रहाणे योग्य नाही म्हणून परशुरामांनी कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अथांग सागराला आपल्या निवासासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याकरिता थोडे मागे हटण्याची विनंती केली.
सागराने ती विनंती मान्य केली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटविला. गुजराथपासून केरळपर्यंत नवा भूप्रदेश निर्माण झाला व परशुरामांनी तपश्चर्येसाठी स्वतःकरिता महेंद्र पर्वताची निवड केली व तो पर्वत म्हणजेच चिपळूण जवळ असलेले श्री क्षेत्र परशुराम.या विश्वव्यापी श्री विष्णूच्या चिरंजीव अवताराने महेंद्र पर्वत म्हणजे कोकणातील आजचे परशुरामक्षेत्र तपश्चर्येसाठी निवड़ले. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला प्रसन्न वातावरण लाभलेले आहे. म्हणूनच हे एक श्रध्दाकेंद्र लोकप्रिय झाले आहे.
साभार – http://www.parshuramdevasthan.org

