लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात लाखो भाविक
मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे
महाराष्ट्रातील मंगळग्रहाचे एकमेव मंदिर – अमळनेर येथे महाराष्ट्रातील एकमेव असे मंगळ ग्रह मंदिर आहे. मंगळ ग्रहाच्या दोष निवारणार्थ काही उपायही शास्त्रकारांनी सुचवले आहेत. या श्रद्धेपोटी मंगळग्रह मंदिराचा शोध भाविकांकडून घेतला जातो. नवग्रहांची भारतात अनेक मंदिरे आहेत मात्र, फक्त मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे.
या ठिकाणी कसे पोहचाल ? अमळनेर येथे चोपडा मार्गावर मंगळग्रह मंदिर असून अमळनेर बसस्थानकापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर आहे. अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. जळगाव शहरापासून अमळनेर शहर हे 59 किलोमीटर असून मोटार वाहनाने दीड तास वेळ लागतो. अमळनेर येथे रेल्वे स्थानक देखील आहे. तुम्हाला जळगाव रेल्वे स्थानकावरून अनेक रेल्वे गाड्या अमळनेर येथे जाण्यासाठी मिळतील.
मंदिराचा इतिहास व स्थापना… अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरातील मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु, १९९३ मध्ये या मंदिराचा दगडूशेठ सराफ यांनी जीर्णोध्दार केल्याचे सांगितले जाते. सराफ यांनी १९४० पर्यंत मंदिरातील सर्व पूजा, विधी नियमित करीत मंदिराचा परिसर विकसित केला. त्यांच्या निधनानंतर हे मंदिर पुन्हा दुर्लक्षित झाले. त्यामुळे काही दिवसातच त्यास भग्नावस्था प्राप्त झाली. त्यानंतर जवळपास १२ वर्ष एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणारे जगदीश नाथजी महाराजांनी या मंदिराला गतवैभव मिळवून दिले. परंतु, काही काळानंतर नाथजी महाराज अचानक मंदिर सोडून निघून गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर बराच काळ मंदिर दुर्लक्षित राहिले. अखेर १९९९ ते २००० दरम्यान मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना होऊन मंदिराचा पुन्हा जिर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर मात्र, मंदिराचा खऱ्या अर्थाने विकास झाला……
मंगळ दोष निवारणासाठी लाखो भाविक येथे येतात….. लग्नपत्रिकेत मंगळ असेल तर या देवाचे दर्शन/अभिषेक केल्यावर लग्न जुळतात भाविकांची श्रद्धा आहे. विवाहोत्सुक उपवारांसह त्यांच्या नातेवाईकांची गर्दी दर मंगळवारी येथे असते. मंगळग्रह भूमिपुत्र असल्याने खरेदी विक्री करणारे अनेक व्यावसायिक मंदिरात अभिषेक करण्यासाठी येत असतात. अभिषेकानंतरच खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनाला मिळणारे समाधानही त्वरित जाणवते. मंदिराच्या आवारात काही वेळ थांबल्यानंतर मिळणारी आनंदाची अनुभूतीही अनुभवल्याशिवाय समजत नाही. निसर्गातल्या सर्वोच्च शक्ती म्हणजे मानवी मनाला असणारा आदर आणि निसर्गातल्या सौंदर्याची असणारी अभिजात ओढ यांची सांगड घालण्यासाठी या धार्मिक स्थळाचा पर्याय कुटुंबासाठीही उत्तम आहे.
मंगळदेव, श्री पंचमुखी हनुमान व श्री भूमीमाता पावन दर्शन – या मंदिरातच मंगळ देवांसोबत पंचमुखी हनुमान आणि भूमीमाता यांचा दर्शनाचा देखील लाभ घेता येतो. काहींच्या मते अमळनेरच्या पुरातन श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार १९३३ मध्ये झाला होता. १९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्यरीत्या कायापालट झाला आहे. मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये वेगवेगळ्या आरत्या होतात.
पर्यावरण संवर्धनचा संदेश – ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यासारखे पर्यावरणपूरक उपक्रम येथे राबविण्यात आले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करीत वनराईचे स्वरुप प्राप्त झाले. साठवण बंधाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात पाणी अडविण्यात आले आहे. त्याच पाण्याचा उपयोग करून परिसरात हिरवळ निर्माण करण्यात आली आहे.
तुळसाई बगीचा – मंदिराच्या बाजूलाच बनविण्यात आलेली तुळसाई बाग तिच्या भव्य स्वरुपामुळे लहान-मोठ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. विविध रंगाची फुले, केळीच्या झाडांची केलेली सजावट, संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेल्या विविध झाडांच्या कुंड्या यामुळे हा बगिचा खऱ्या अर्थाने सजलेला दिसतो. मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी आहेत.
पिकनीक स्पॉट – पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे, कारंजे, नेत्रदीपक रोषणाई, नयनरम्य हिरवळीसह भाविकांसाठी असलेल्या सर्व प्रकारच्या सेवासुविधा यामुळे मंदिराला पिकनीक स्पॉट तसेच पर्यटन स्थळ म्हणूनही व्यापक प्रसिध्दी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना सहलीसाठी येतात. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारासमोर शेड उभारण्यात आलेले आहे. बाजूलाच नवकार कुटीया व त्याखाली शंकराची मूर्ती व जटांमधून बरसणाऱ्या धारा व धबधब्याची आरास उभारण्यात आला आहे.
उत्तम निवास व्यावस्था असलेले भक्तनिवास – मंदिराच्या आवारातच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था देखील आहे. यात महागड्या हॉटेल्स सारख्याच सर्व सुविधायुक्त दोन ए.सी. रुमही आहेत. त्याच प्रमाणे दोन मोठ्या हॉल्सच्या माध्यमातून अत्यल्प दरात निवासाची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे.
दर मंगळवारी महाप्रसाद – दर मंगळवारी मंदिराला शिर्डी, शेगाव प्रमाणेच यात्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. मंदिर प्रशासनातर्फे फक्त पंधरा रुपयात महाप्रसाद दिला जातो. यात कांदा व लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूर डाळ, भात, पुरी व गुळाचा शिरा दिला जातो. या महाप्रसादाने आलेले भाविक नक्कीच तृप्त होतात. करोना काळात हा महाप्रसाद बंद करण्यात आला होता. आता पुन्हा सर्व सण उत्सव साजरे होत असून, यंदा चैत्र नवरात्रीनिमीत्त शतचंडी महायज्ञ देखील करण्यात आला. ज्यांना मंगळ किंवा मांगलिक दोष असतात तसेच विवाहात अडथळे येत असले तर हे दूर करण्यासाठी भावीक श्रद्धेने या मंदिरात येतात.
एकदा अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. लेख तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा व ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहचवा .
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,125)
- Mahaparyatan Business (4)
- Uncategorized (9)
- ऐतिहासिक ठिकाणे (15)
- कथाकथन / प्रवासवर्णन (1)
- कृषी पर्यटन (16)
- कृषी माहिती आणि उत्पादने (90)
- खाद्य भ्रमंती (6)
- गड, सागरी किल्ले (10)
- धबधबे (5)
- परंपरा / सण / उत्सव (19)
- प्राचीन देवस्थाने (45)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (29)
- समुद्रकिनारे (12)
- साहसी पर्यटन (6)