दुपदरीकरण, संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीपथावर
रायगड| वरंध घाटातील रस्त्याची कामे प्रगतपथावर असुन दोन महीन्यांकरता सर्वप्रकारच्या वाहतुकीस घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरंध घाटातून वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवासी आणि पर्यटकांची मात्र गैरसोय होणार आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांचे कार्यालयाकडील संदर्भिय पत्रानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ किमी ८८/१०० (मौजे वरंध) ते किमी ९६/७०० रायगड जिल्हा (हर) वरंध घाट दरम्यानची सुमारे २१.६०० कि.मी. लांबी या विभागाच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे.
सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे, परंतू साखळी क्रमांक ९४/००० (पारमाची वाडी) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे, परंतू सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
पावसाळ्यापुर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. यास्तव दि.०१/०४/२०२४ ते दि.३०/०५/२०२४ पर्यंत वरंध गाव ते रायगड जिल्हाच्याहद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी अशी विनंती संदर्भिय पत्रान्वये केलेली आहे. प्रस्तावित मार्गाबाबत आवश्यक ती पडताळणा करुन, पर्यायी रस्त्याची उपलब्धता इ. बाबी तपासून आपले अभिप्राय तात्काळ या कार्यालयास सादर करावेत, ही विनंती करण्यात आली आहे.