आसूद बाग गावाची नारळ-पोफळीच्या बागेला पाणी वितरणाची प्राचीन पद्धत !!
लोकसहभागातून गावातील बागायतदारांनी केला नैसर्गिक गुरुत्वाकर्षणाचा कल्पक उपयोग !!!
कायमस्वरूपी पाण्याचा नैसर्गिक ओघ असलेले गाव आपण बघितले आहे का ? दापोली तालुक्यातील आसुद बाग गावाचे पिण्यासाठी आणि बागायतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करणारे अनोखे तंत्र, गावकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातून राबविली प्राचीन पाणी पुरवठा पद्धत, स्थानिक शेतकऱ्यांनी केला गुरुत्वाकर्षणाचा कल्पक वापर, वणंद आणि आसूद गावांच्या मध्यातून वाहणाऱ्या नदीवर बंधारा घालून 2 किलोमीटर अंतरावरून पाटाच्या साहाय्याने सुपारीला होतो पाणी पुरवठा,
महापर्यटन च्या माध्यमातून आम्ही आपल्याला नवनवीन पर्यटन स्थळांचे चित्रीकरणासाठी आमची महाराष्ट्रभर भ्रमंती सुरू असते. आम्ही आसुद गावात पोचलो असता आम्हाला या गावातील दाबके वाडीत रवींद्र दाबके या गावकाऱ्याशी भेट झाली. गावाविषयी चर्चा करतअसतांना त्यांच्याकडून येथे पिण्यासाठी आणि बागायतीसाठी वर्षभर लागणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी अनोख्या पद्धतीची माहिती मिळाली. 14 पिढ्यांपासून अव्याहतपणे सुरु असलेली ही पाणी व्यवस्था आजही अस्तित्वात असल्याचे दिसून येते .
गावातल्या सुमारे तीनशे एकर क्षेत्रातील बागायतीला वर्षभर पाणी मिळावे म्हणून गावात अंदाजे ५०० वर्षांपूर्वीपासून पाण्याचे असे नियोजन करण्यात आले आहे की, आजही गावाला गुरुत्वाकर्षणाने मुबलक पाणी मिळते. नारळ-पोफळीच्या बागांमुळे ‘आसूद बाग / दाबकेवाडी’ या नावाने हि हे गाव ओळखले जाते. कोकणातील प्राचीन बागांचा उत्कृष्टनमुना येथे आजही पाहायला मिळतो. शेतकऱ्यांनी वर्षाभराच्या प्रत्येक मिनिटाचे पाणी नियोजन करून लोकसहभागातून दोन किलोमीटर लांब असलेल्या नदीवर मातीचा बंधारा बांधून नैसर्गिक गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाटाद्वारे सुपारीच्या बागा फुलविल्या आहेत.
एकीकडे राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना या गावातील शेतकऱ्यांनी पाणी नियोजनाचा आदर्श घालून दिला आहे. कोकणात धो-धो पडणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष पाहायला मिळते. दरवर्षी अनेक गावे, वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा हि करावा लागतो. आसूद गाव मात्र याला अपवाद आहे. वणंद आणि आसूद या दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीवर दगड/मातीचा बंधारा घालून अंदाजे २ किलोमीटरवरून पाटाने पाणी आणले जाते. त्यावर बागायती येथील होते. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर नदीवर शेतकरी श्रमदान करून बंधारा बांधला जातो. बंधारा बांधणे, पाटाची डागडुजी यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे वर्गणी गोळा केली जाते. प्रत्येक बागायतीच्या क्षेत्रफळाप्रमाणे पाणीवाटप केले जाते. २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो. प्रत्येकाच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे त्याने पाणी घ्यायचे असते. नियोजनबद्ध पाणी मिळण्यासाठी एक समिती हि स्थापन करण्यात आली आहे. गावातील सर्वच बागायतदार समितीचे सभासद आहेत. वर्षातून एकदा बैठक होते. मिनिटाला दहा रूपये दराप्रमाणे पाणीवाटप होते. स्वत:च्या वाट्याचे पाणी घेतल्यानंतर प्रवाह बदलून दुसऱ्या शेतकऱ्याला दिला जातो. रात्रीच्या वेळेतही हे काम नियोजनानुसार सुरु असते.
याविषयी आसूद बाग गावातील दाबके वाडीत निवास असणाऱ्या श्री रवींद्र दाबके यांनी दिलेली माहिती……..
पावसाळा संपल्यानंतर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर दगड/मातीचा कच्चा बंधारा घालून परिसरातील सुपारीच्या बागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार पाटाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. सुपारीचे जे क्षेत्र आहे ते पूर्ण क्षेत्र भिजण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार दर आठवड्यातुन एकदा बागांना पाण्याचे वितरण केले जाते. प्रत्येक बागायतीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक ठरवलेले असते. पुढल्यावर्षी पाऊस पडेपर्यंत ही पाणी पुरवठा करणारी यंत्रणा राबविली जाते. सहकार तत्वावर सर्व बागायतदार मिळून 10 रुपये प्रति मिनिट अशी वर्गणी गोळा केली जाते. वर्गणीच्या माध्यमातून जमा होणारा निधी मेंटेनन्स साठी वापरला जातो. लोकसभागातून हा प्रकल्प राबविला जातो. 14 पिढ्यांपासून पिण्यासाठी सुद्धा हेच पाणी वापरले जायचे मात्र 2016/17 सालापासून गावात नळपाणी योजना सुरू झाली आणि पिण्यासाठी म्हणून या पाण्याचा वापर कमी झाला. आजही पाटाद्वारे येणारे हे पाणी पिण्यासाठी आणि बागायतीसाठी वापरले जाते. स्थानिक लोकांना याची माहिती असते की हे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरले जात असल्याने पाटात कोणी कचरा वैगैरे टाकत नाहीत, स्वच्छता राखली जाते. पर्यटक ज्या वेळी गावात येतात त्यांना शहरात असलेल्या गटारांची माहिती असते. हा पाट जो गटारासारखा दिसत असल्याने पर्यटकांचा गैरसमज होतो की ही गटार आहे, त्यामुळे गावकऱ्यांना त्यांना सांगावे लागते की हा गटार नव्हे तर पाट आहे आणि त्यातून येणारे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरले जाते. असं सांगितल्यावर पर्यटकांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
Mahaparyatan.com
अनुकरणीय उपक्रम, सर्व गावकर्यांचे , आसूदकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹